*तरी श्रद्धा करूनि आदरे.*
अध्यात्म हे श्रद्धेचे शास्त्र आहे. परमार्थात भाव, श्रद्धा, विश्वास, निष्ठा, अनन्यता असेल तरच त्याचे फळ मिळते. भगवान अर्जुनाला म्हणतात;
*ये तू धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते |*
*श्रध्दधाना मत्परमा भक्तास्ते अतीव मे प्रियाः||*
जे भक्त माझ्यावर श्रद्धा ठेवून मत्परायण राहतात ते भक्त मला अतिशय प्रिय आहेत. साधकाच्या अंतःकरणात परम श्रद्धा असेल तरच निराकाराचे दर्शन होईल. श्रद्धेतच ईश्वराचे अस्तित्व दडलेले आहे. ज्ञानोबाराय महाराज म्हणतात;
*तरी श्रद्धा करूनि आदरें |*
*जयाच्या ठायी विस्तारें |*
*जीविं जेयां थारें |*
*अनुष्ठिती ||*
भक्ती साधनेत मुख्यतः श्रद्धाच लागते. कारण भक्तीचे फल अदृष्ट आहे. दृष्ट फलाकरिता श्रद्धेची आवश्यकता नाही. भगवान म्हणतात; *श्रद्धावान लभते ज्ञानम् !* आपण म्हणाल; श्रद्धा म्हणजे तरी काय. .? शास्त्रकार श्रद्धेची व्याख्या करतात;
*तत्र श्रुतिवाक्ये गुरूक्तौच सत्य बुद्धिः श्रद्धा. ..!*
श्रुतिवाक्याच्या ठिकाणी व सद्गुरु वचनाच्या ठिकाणी जी सत्यत्व बुद्धी तिला श्रद्धा असे म्हणतात. सत्य मानण्याचे नाव श्रद्धा. शास्त्रकार म्हणतात;
*तादृश्यव्यभिचारिणी श्रद्धा यस्यास्ति श्रद्धावान. ..!*
देव आहे तो सर्वत्र व सर्वान्तरयामि आहे अशी अव्यभिचारिणी श्रद्धा ज्याच्याकडे आहे तो श्रद्धावान. संतांची शास्र प्रमाणावर किती अढळ श्रद्धा होती. ज्ञानोबाराय महाराज म्हणतात;
*पै अहिता पासोनि काढिती |*
*हित देऊनि वाढविती |*
*नाही गा श्रुति परौती |*
*माऊली जगा ||*
अहिता पासून निवृत्त करून हिताचाच उपदेश करणारी श्रुती सारखी माता या जगात नाही. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची देखील वैदिक शास्त्रावर किती नितांत श्रद्धा होती. महाराज एका अभंगात म्हणतात;
*अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा ।*
*ओळखा जातीचा अंत्यज तो ॥१॥*
*वेद श्रुति नाहीं ग्रंथ ज्या प्रमाण ।*
*श्रेष्ठाचें वचन न मानी जो ॥ध्रु.॥*
या प्रमाणांचा विचार एवढ्या साठी सांगितला की; वेद वचन आणि गुरू वचनावरील विश्वासालाच श्रद्धा असे म्हणतात.
No comments:
Post a Comment